Thursday, 25 June 2015

"जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे"



'जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे' हे मान्य करण्यात काय लहानपणा आहे हे अजून हि मला कळत नाही आणि आपले पुढारी तर त्यात अजून माहीर आहेत. याचा संदर्भ आहे अलीकडेच योगदिनानिमित्त घडलेल्या गोष्टी. मग त्यात अश्या अश्या बातम्या झळकल्या कि सांगता कामा नये. 'पैगंबर योग करीत होते का' योगाचा हिंदू धर्माशी काय संबंध' तिकडे पाशिमात्यामध्ये चाललेले धर्म किंवा धर्म निरपेक्ष पणाचे दर्शन, वगैरे वगैरे.. आता यात खरे तर उगीच आक्षेप आणले जात आहेत हे सामान्य माणूस जाणतो, पण त्याला वेगवेगळ्या गटामध्ये खेचण्याचे, किंबहुना अडकविण्याचे काम हे पुढारी लोक करीत आले, मग ते राजकारणी असो कि समाजकारणी. त्यावरून भाजप सरकारची गोची कशी करायची आणि आपला राजनीतिक फायदा कसा करून घ्यायचा हे फक्त डोळ्यासमोर ठेवून विरोधक मग जे आणि जसे जमेल तशी वक्तव्य करू लागले. त्यात मग सरकार सुद्धा मागे नाही राहिले.

योग आणि हिंदू धर्म याचा दृढ संबंध जगमान्य असताना त्याची सक्ती करणे हे चुकेच होय. पण यापुढे जावून बोलायचे झाले तर, हे काही आताच झाले आणि याला सर्वस्वी भाजप आणि संघ जिम्मेदार आहे हे ठरविणे योग्य आहे का हे सुद्धा तपासणे जरुरी आहे. यासाठी मला माझ्या बालपणातील शाळेतले दिवस आठवले. माझी शिक्षण १९८६ ते १९९६ या दरम्यान सरकारी शाळेतच झाले. त्यावेळी आणि आता सुद्धा माझ्या गावात एकच शाळा आहे. तेव्हा (आणि किंबहुना आताही) शाळेमध्ये दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा होत असे, कवायत होत असे जिथे अशीच काही योगासने करून घेतली जात असे, वेगवेगळ्या थोर महापुरुषावर निबंधस्पर्धा आणि भाषणे होत असे. हे आमच्या भागातील प्रत्येक शाळेत घडत असे. कुठेहि आणि कुठल्याही धर्माचा यावर परिणाम होत नव्हता आणि त्यावरून काही प्रतिकार वगैरे झालेले मला तरी आठवत नाही. तो तर असा काळ होता जेव्हा शासन कॉंग्रेस चेच होते, महाराष्ट्रामध्ये आणि  दिल्लीमध्ये सुद्धा. मग आता काय होते आहे कॉंग्रेस ला आणि इतर विरोधकांना? कुठे गेल्या होत्या त्या वेळेस सगळ्या मुस्लीम संगठना? का आताच मुस्लीम संगठना आवाज उठवत आहेत? बिहार मध्ये सुद्धा २ वर्ष्यापुर्वीच 'सूर्यनमस्कार' शाळेमधील कार्याक्रमधून हटविण्यात आले. तो पर्यंत कुठे होत्या या संगठना? 

दैनंदिन जीवनामधील प्रत्येक आणि कुठल्याही गोष्टीचा संबंध उगीच धर्म शी लावण्याची सांगड काही रिकामटेकड्या संगठना करत असतात ज्यांना जन माणसामध्ये किती स्थान आहे यावरच खरे प्रश्नचिन्ह लगते. सामान्य माणसाच्या मनात तर रोज भेडसावणाऱ्या  याहून महत्वाच्या कितीतरी समस्या असतात कि त्यांना अश्या गोष्टी साठीकिंचित वेळ सुद्धा नसतो. जर असे नसते तर सोनू निगम कधी 'मुबारक मुबारक' आणि 'मेरे मौला' अश्या प्रकारची गीते कधी म्हणाली नसती, किंवा उस्ताद झाकीर हुसैन यांनी, शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, विठलाच्या मूर्तीसमोर अभंगवाणी गात असताना अतिशय मुग्ध होवून तबला वाजवला नसता. याच्या हि पुढे सांगायचे तर, गुलामअली साहेबांचे पाकिस्तान पेक्ष्या भारतामध्ये जास्ती चाहते नसते. कारण सोनू निगम, गुलामअली किंवा जाकीर हुसैन, याचा एकच धर्म, तो म्हणजे "उत्कृष्ट कला सादर करणे' आणि हाच खरा धर्म आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये. म्हणून ज्या गोष्टी विनाकारण समाजामध्ये तेढ वाढविण्यासाठी केल्या जातात. त्यात काही तथ्य नसते, आणि जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे असे मानून चांगल्या गोष्टी आपल्या मध्ये आणल्याचे प्रयत्न करणे काहीच चुकीचे नाही, हे समजले पाहिजे..

No comments:

Post a Comment